Introduction

काहीतरी ऊगाचच!

0 टिप्पणी(ण्या)
भरपुर दिवस झाले शेवटची पोस्ट टाकुन! म्हणुन काहीतरी टाकायच ठरवलं नि हे घरातल्या गणेशोत्सवाचे प्रकाशचित्र टाकली. काहीही लिहायचा सद्ध्या मनस्थिती नाहीये! म्हणुन....






Posted by Picasa

एक उदास आठवडा!

0 टिप्पणी(ण्या)
बरेच दिवस झाले काहीही लिहायला जमलेलं नाही. एका वेगळ्याच तणावाखाली आहे सध्या मी! नुकताच आजारातुनपण ऊठलो आहे नि ऑफिसमध्ये सुद्धा सध्या काही प्रॉब्लेम्स चालु आहेत. वाटतय लय भाकऱ्या खाल्ल्या ह्या कंपनीच्या! अजुन ह्यावर्षीचं ’इन्क्रिमेंट’पण नाही झालं! आणि ते होणार नाहीये ही आतल्या गोटातली बातमी आता आतल्या गोटात राहीलेली नाही!त्यातल्या त्यात नशिब हेच की अजुन कुणाला काढलेल नाहीए. बघुया काय होतय ते!
त्यात ह्या आजरपणामुळे पक्का ’विकनेस’ आला आहे. पाच दिवस नाही गेलो नव्हतो ऑफिसात! तरी अजुनही वैद्यबुवांनी ’शय्या आराम’ करायला सांगितला आहे. त्यांना सांगायला काय जातय. इथे पाच दिवस नाही गेलो तर फोन करुन काय वैताग आणला ते माझं मला माहिती! त्यात माझा एमिजिएट बॉसपण नेमका माझ्याबरोबरच आजारी पडून सुट्टीवर गेला आणि तो हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे सगळ्यांचे फोन मला घेणं भाग होतं! कधी कधी वाटत होतं, ऊगाच आलो ह्या सेवा क्षेत्रात!

खरचं जास्त वेळ बसला की कंटाळा येतोय अजुनही! तीन दिवस झालेयेत कार्यालयात जायला सुरुवात केली त्याला! आणि मागच्या तीन दिवसांपासुन एकच काम करतोय! एक साईट डिप्लॉय करतोय पण IIS 7 आणि Windows Server 2008 Data Center मध्ये ती अजिबातच काम करत नाहीये! आणि तीच साईट IIS 6 आणि Windows Server 2003 मध्ये मस्त चालतेय! कुठेतरी काहीतरी मिस होतय! डोक्याचा भुगा झालाय नुसता! शिवाय ह्या कामानंतर मागच्या पाच दिवसांचा बॅकलॉगसुद्धा भरुन काढायचा आहे! खुप खुप काम आहे!

आणि जॉब स्विचसाठी आतातरी अभ्यासाला सुरुवात करावी असं वाटतय! कुठल्याही परीस्थितीत ही कंपनी सोडण्याचा विचार बळावत चाललेला आहे! एकंदरीत ऑगस्ट त्रासात जाणारेय असं चित्र सध्यातरी दिसतयं! बघु ह्या त्रासातुन कधी बाहेर पडतो ते!

माथेरान वारी

2 टिप्पणी(ण्या)
मागच्या रविवारी आम्ही मित्र माथेरानला जाऊन आलो. नविन घेतलेल्या कॅमेराने काढलेली ही काही छायाचित्रे. पहिला प्रयत्न असल्याने काही चांगली आली नि बरीचशी....! तुम्हीच ठरवा आता!

लोकलचा ’फर्स्ट क्लास’

0 टिप्पणी(ण्या)
लहानपणी मोठेबाबांकडे जाण्यासाठी जेव्हा जेव्हा लोकल ट्रेनने प्रवास करायचो तेव्हा तेव्हा ’फर्स्ट क्लास’चा रिकामा डब्बा पाहुन त्या डब्ब्यात प्रवास करावा असं वाटत राहयचे! पण त्याकाळच्या परिस्थितीत ते शक्य नव्हतं! पण जसा नोकरीला लागलो नि पगार वाढत गेला तेव्हा प्रथम दर्जाचा मासिक पास काढावासा वाटला नि हा विचार लगेच अंमलात आणला. लोकलच्या ’द्वितीय दर्जा’ ते ’पहला दर्जा’ ह्या प्रवासात जाणवल की येथे फक्त डब्ब्यांच्या ’सिट्स’ मध्येच नाही तर प्रवाशांच्या ’थॉट्स’ मध्ये सुद्धा बराच फरक आहे.

द्वितीय दर्जा हा सर्वसमावेशक असल्यामुळे येथे अठरापगड लोक दिसुन येतात. कुणीही कोणत्याही अवतारात आला तरी त्याला डब्ब्यात जागा असते. मग त्याच्याकडे तिकीट असो किंवा नसो! पहिल्या दर्जाच्या डब्ब्यात मात्र अवतार हा नेहमी ’अप टु डेट’च असावा लागतो!  नाहीतर लगेच, ’बॉस, फर्स्ट क्लास है!" चा ओरडा चालु होतो. मलासुद्धा एकदा ह्या दर्जाची हवा लागली. मी एका पोरगेलासा दिसणाऱ्या व्यक्तीला त्याचा अवतार पाहुन असंच म्हटलं ’बॉस, पुढच्या स्टेशनला ऊतरुन घे, टी.सी. आलातर ऊगाच २००-३०० जातील फुकटचे!’ तेव्हा त्याने मला जे उत्तर दिले त्याने मी ठरवलं इथुनपुढे कधीही कुणालाही ’फर्स्ट क्लास है’ हे सांगायचं नाही. तो मला म्हणाला, ’मला माहिती आहे, हा आमचा युनिफॉर्म आहे नि मी एका कॉलेजमध्ये स्पोर्ट्स कोच आहे!"

हिच गत पहिल्या दर्जात दिसणाऱ्या वर्तमानपत्रांध्ये दिसुन येते. मला कधी कधी संशय येतो की रेल्वेने फर्स्ट क्लासचा पास देण्यासाठी ’एकॉनॉमिक्स टाईम्स’ कंपलसरी केलाय की काय? ज्याच्या त्याच्या कडे बघावं तर हे वर्तमानपत्र. प्रत्येकजण जणु काही मोठा शेअर ब्रोकरच! हा नसला तर डि.एन.ए नाहीतर ’टाईम्स’ आहेच! तसंच हातातल्या पुस्तकांचं. इथेही इंग्रजीच पुस्तक असतं आणि तेही ’नेहेमीच्याच यशस्वी कलाकारांचंच’. हे नेहेमीचेच यशस्वी कलाकार म्हणजे सिडने शेल्डॉन, जॉन ग्रिशम आणि पाऊलो कोहेलो! ह्याव्यतिरिक्त मला कधी कुणी क्वचितच दिसला असेल! मराठी वर्तमानपत्र कदाचित दिसेन ह्यांच्या हातात, पण बाकीचे मराठी लेखक तर सोडाच पण एव्हरग्रीन पुलंचही पुस्तक कधी दिसणार नाही!

इथली लोकं चुकुनही दुसऱ्याला बसायला जागा देणार नाहीत. मुंबई ते डोंबिवली, एकदा बसले म्हणजे बसले! ऊठायचे ते फक्त ऊतरायचे स्थानक येण्याचा काही सेकंद अगोदर! दुसऱ्या दर्जाच्या डब्ब्यात मात्र गाडीने विक्रोळी सोडले की कल्याणपासुन उभी असणारी लोकंच हक्काने सांगतात ’चलो भाई, पंप बंद करेके बैठनेको जगह दे दो!’ आणि तिनच्या सिटवर चौथा हक्काने ’थोडा खिसके बैठो’ म्हणुन जागा मागतो. ह्यात बसलेल्या तिघांनापण काही वावगे वाटत नाही. तेसुद्धा शांतपणे सरकुन जागा देतात. पहिल्या दर्जात मात्र तिनच्या सिटवर फक्त तिघेच बसतील! भले ते कितीही बारीक का असेनात!

पहिल्या दर्जातले लोक तसे पक्के शामळु! साधा बंद पंखा चालु करायला ही लोक सांगत नाहीत! बहुतेक असं कुणाला काही काम सांगणं ह्यांच्या ’स्टेटस’ मध्ये बसत नसावं! इतरवेळी कायद्याप्रमाणे वागणारी ही माणसे फक्त एकाबाबतीत थोडा धीटपणा दाखवतात. ’कृपया सीटवर पाय ठेवु नये.’ ह्या सुचनेचे उल्लंघन करताना! एवढी शिकलेली माणसे, पण ही साधी सुचना का पाळत नाही हे मला कधीच समजलेले नाही. ह्या सुचनेतुन ह्या लोकांनी एक मस्त पळवाट शोधुन काढलेली आहे. ती म्हणजे चपला किंवा बुट काढुन सीट्सवर पाय ठेवण्याची! पण अरे मुर्खांनो सुचना पाय न ठेवण्याची आहे, पादत्राणे न ठेवण्याची नाही!

माझं ह्या दर्ज्याच्या लोकांबाबतीत आणखी एक निरिक्षण अस आहे की, बहुतेक सर्व दक्षिण भारतीय ह्याच डब्ब्यातुन प्रवास करताना दिसतात! ह्यांचे सगळ्यात मोठे लक्षण म्हणजे ह्यातील बहुतेकजण हा सर्व डब्बा आपलाच आहे ह्या विचारात असतात! इतरांना ते अक्षरशः कःपदार्थ समजतात! एक किस्सा आठवला म्हणुन सांगतो. सकाळच्या डोंबिवली लोकलला ह्या पहिल्या वर्गाच्या डब्ब्यात एक मोठा दक्षिण भारतीय ग्रुप चढतो आणि दरवाज्याच्या मधल्या मोकळ्या जागेत जागा अडवुन उभा असतो. एकदा २-३ रेल्वेचे लाईनमन ह्या डब्ब्यात चढले. त्यांचे कपड्यांचा मुळचा लाल रंग जाऊन तो काहीतरी भलताच झाला होता. ह्या ग्रुपमधला एकजण बोललाच ’ये फर्स्ट क्लास है!’ ग्रुपमधला दुसऱ्याने पहिल्याला अडवुन म्हटले ’रेल्वेवाले है, उनके बाप का गाडी है!’ ह्यावर एक लाईनमनने त्यांना सुनावले ’निचे उतरके गाडी आगे नही जाने दुंगा ना तो भी कोई हमे कुछ नही कहेगा! तम्मीजसे बात करो!’

ह्या लोकांचा हा अनुभव तर गुजराती लोकांची आणखी वेगळीच तऱ्हा! ही जमात दुसऱ्यांना मदत करायला नेहमीच पुढे. गर्दीत अनोळ्खी लोकांना पाणी दे नाहीतर उठुन जागा दे अशाप्रकारे ह्यांचं समाजकार्य चालु असतं! पण ह्यांचा तीन गोष्टीत फार राग येतो! एक म्हणजे ह्यांनी शेअर मार्केटवर चर्चा सुरु केली की, पत्ते खेळायला सुरुवात केली की नि गुटखा खाल्ला की! ही लोकं नेहेमी पन्नास जणांशी एकाचवेळेला बोलल्यासारखे ओरडुन का बोलत असतात कुणास ठाऊक? ह्या दोन जमाती सोडल्यातर पहिल्या वर्गात सहसा काहीही ’इंट्रेस्टिंग’ घडवुन आणत नाही!

तर असा हा पहिला वर्ग! ’व्हाईट कॉलर्ड’ आणि ’स्टीफ अपर लीप’ वाल्यांचा वर्ग! आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे तो प्रत्येक वेळेला लक्षात ठेवत असतो. म्हणुन तर पास किंवा तिकीट काढताना देखील हा वर्ग रुबाबात रांगेतल्या १-१ २-२ तास ऊभ्या असणाऱ्या लोकांकडे तुच्छ नजरेने बघत सरळ पुढे जातो नि तिकीट पास काढुन रुबाबात निघुन जातो. रांगेतले बिचारे त्याच्यामागे शंख करतात ’फर्स्ट क्लास का क्या निकाला तो सालेने पुरा रेल्वेही खरीद लिया!’

पुंडलिक वरदे हरि विठ्ठल

1 टिप्पणी(ण्या)
काल जेष्ठ कृष्ण सप्तमी. अवघ्या महाराष्ट्राची माऊली संतश्रेष्ठ श्री ज्ञानोबा ह्यांच्या पालखीचे आळंदीहुन पंढरपुरसाठी प्रस्थान झाले. त्याअगोदर दोन दिवस जगतगुरु तुकोबाराय ह्यांची पालखी देहुहुन निघाली. दोन्ही पालख्या आणि इतर संतांच्या पालख्या ह्या साधारण १८-२० दिवसांचा प्रवास करुन आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी ’आषाढी एकादशी’ साठी पंढरपुर येथे पोहचतील.

ह्यावर्षी पालखीच्या प्रस्थानाच्या दिवशी आळंदीत जाण्याचा योग आला. तसं आमचं घराणं माळकरी! आमचे मोठेबाबा हे दरवर्षी वारीला न चुकता जाणारे. आमचे पप्पा कधी पायी वारीला गेल्याचे मला आठवत नाही पण ते प्रत्येक आषाढीला पंढरपुरला जातात. म्हणजे वारी आम्हाला नविन नाही. पण मी मात्र पहिल्यांदाच वारीत सहभागी झालो होतो. मान्य आहे कि पालखी प्रस्थान सोहळा म्हणजे काही वारी नव्हे पण वारीच्या ह्या सोहळ्यातसुद्धा सुमारे २-३ लाख लोक सहभागी झाले होते. आणि हा सोहळा खरोखर अनुभवण्यासारखा असतो.

वारीत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राच्या (कि देशाच्या? कारण कर्नाटकातुन आलेल्या काही गाड्या मी काल तिथे पाहिल्या!) कानाकोपऱ्यातुन वारकरी आले होते. ह्यात सर्व जातीधर्माचे लोक होते. कोणीही उच्च निच भेदभाव पाळत नव्हता. प्रत्येकजण एकमेकाला ’माऊली’ ह्याच नावाने संबोधत होता. एका म्हाताऱ्या आजीचा मला धक्का लागला तर ती चक्क मला ’माऊली’ म्हणुन मला पटापट चालायला सांगत होती. अक्षरश: माझ्या तीन वर्षाच्या मुलाला बघुन म्हणाली ’ह्या माऊलीला वारीला आणलत ते बरं केलंत!’ माझ्या आजीच्या वयाची ती बाई मला व माझ्या पोराला ’माऊली’ म्हणतेय हे बघुन खरोखर माझ्या डोळ्यांत पाणी आलं!

आपल्या घरादाराची चिंता काळजी मागे ठेऊन हे सर्वजण १५ दिवस एकच ध्यास घेऊन चालत असतात. त्यांच्या विठुरायाच्या दर्शनाचा ध्यास! खरतर हे पावसाळ्याचे दिवस म्हणजे त्यांचे कामाचे दिवस पण सर्व कामे आटोपुन किंवा आपल्या लेकासुंनांवर सोपवुन ही सर्व निघालेली असतात त्या ’विठ्याच्या’ दर्शनाला! आणि प्रस्थान सोहळ्यासाठी आलेला प्रत्येकजण पुढे वारीला जातो असे काही नाही! काहीजण हा प्रस्थान सोहळा आटोपुन परत आपल्या गावी परतात! काल ’भारत बंद’! सर्व सार्वजनिक वाहतुक जवळ जवळ बंदच होती! शिवाय कुठेही कधीही ’राडा’ होऊ शकेल ह्याची भिती होती. पण ती चिंता ते क्लेश जणु ’देशांतरा’ पाठवुन ही सगळी मंडळी काल आळंदीत जमा झाली होती! मी आळंदीतुन पुण्याला परत येण्यासाठी निघालो तेव्हा एकजण मला म्हणाला की मलापण बार्शीला जायाच्या गाड्या निघतात तिथवर सोडाल का? चौकशी करता कळली कि तो निव्वळ ह्या ’दिंडीला वाटंला लावायला’ बार्शी तालुक्यातला कुठल्याशा गावातुन आला होता. घरात एकवेळ खाण्याची भ्रांत असेल पण वारीला जाण्यासाठी ही लोकं कुणापुढे हात पसरायला मागे पुढे पाहत नाहीत! वर्षाच्या अकरा महिन्यांचे कष्ट कित्येकजण निव्वळ ह्या एका महिन्यासाठी सहन करीत असतात!

आणि एवढी गर्दी असुनही मला कुठेही कोणत्याही प्रकारची गैरसोय किंवा गडबड दिसली नाही. जो तो एकदम शिस्तबद्ध वागताना दिसत होता. प्रत्येकजण इतका शिस्तीत होता की मनात विचार आला की वारीव्यतिरिक्त ह्यातले कितीजण एवढी शिस्त पाळत असतील? पण सांगायचा मुद्दा हा की खरोखरच काल कुठलाही प्रकारचा गोंधळ नव्हता. सगळ्या गाड्या व्यवस्थित पार्क केल्या होत्या! एकामागोमाग एक दिंड्या निघत होत्या पण त्या वाहतुकीला तसुभरही अडचण आणत नव्हत्या! मुळात कुणीही त्या गर्दीत उगाचच गाडी घालण्याचा प्रयत्न करीत नव्हता! जणु काही ’माऊली माऊली’ म्हणुन प्रत्येकाच्याच मनात एकप्रकारचा दुसऱ्याविषयी मायेचा ओलावा भरुन आला होता! वाहतुक पोलीस होते. पण त्यांना बिलकुल काम करण्याची गरजच नव्हती. एवढ्या प्रचंड जनसमुदायाला आवर घालण हे खरतर अतिशय कठिण पण इथे मात्र ते सगळ्यात सोपं असल्यासारखं वाटत होतं! पोलिसांनीसुद्धा त्यांचा जगप्रसिद्ध पोलिसी खाक्या इंद्रायणीत सोडुन दिला होता. एकाही पोलिसाला कुणावरही एकदाही उगाचच डाफरताना पाहिल नाही! तेसुद्धा ’माऊली’ म्हणुनच सगळ्यांना वागवत होते!

 आणि जशी ’माऊलीं’ची पालखी महादरवाज्याचा बाहेर पडली तसा सगळीकडे एकच नाद ऐकु येउ लागला ’पुंडलिक वरदे हरि विठ्ठल’! सगळीकडुन टाळ नि मृदुंगाचे स्वर ऐकु येत होते. भजनांचे आवाज आसमंत भारुन टाकत होते! एका दिव्य यात्रेला प्रारंभ झाला होता! अवघ्या महाराष्ट्राचे सर्व प्रश्न आता मागे पडणार आहेत! ग्यानबा तुकाराम हेच आता विदर्भ, मराठवाडा कोकण पश्चिम महाराष्ट्र सगळीकडे असणार आहेत. आता पाउले चालणार आहेत ती पंढरीची वाट!

भटकंती

0 टिप्पणी(ण्या)
 पावसाला सुरुवात झाली की प्रत्येक (म्हणजे जवळजवळ प्रत्येक, कारण माझा एक मित्र आहे. तो म्हणजे पक्का घरकोंबडा! अगोदर ’मेडिकल रिझन्स’मुळे घर सोडत नव्हता आणि आता ’मॅरिटल रिझन्स’मुळे घर सोडत नाही! आणि माझ्या ह्या मित्रासारखे आणखी बरेच असतील. तर असो!) मुंबईकर (हो...हो पुणेकर देखील रे बाबांनो!) गुगलबाबांना नवस बोलतात कि ’बाबारे मला नि माझ्या ग्रुपला भटकायला योग्य ठिकाण सांग, मी पुढचं वर्षभर इतर कुठल्याही बाबाच्या आश्रमात हिंडणार ’बिंग’णार नाही! आणि गुगलबाबांना केलेला नवस नेहमीच फळतो!

तर बराच वेळ गुगला-गुगली केल्यानंतर आमच्या संघाचा (अरे यार ’ग्रुप’ला मराठीत काय बोलतात?) ह्यावेळेचा ट्रेक राजमाची ठरला आहे. आता तुम्ही म्हणाल जर ट्रेक ठरला आहे आणि हा अजुन जाऊनपण आलेला नाही तर मग ह्या टपालीचं (’पोस्ट’ला हा शब्द योग्य आहे का?) महत्त्व काय? तर मला तुमच्याकडुन माहिती हवी आहे!

सगळ्यात पहिले म्हणजे आम्ही डोंबिवलीमधुन निघणार आहोत. आणि आम्हाला एक रात्र निवास करायचा आहे तर त्यासाठी आणखी काही ठिकाणं सुचवु शकलात तर फार बर होईल! म्हणजे आम्ही शुक्रवारी रात्री निघु शकतो. दुसरं म्हणजे जर तुम्ही मला येण्याजाण्याची माहिती सुद्धा द्यावीत! कृपया मला माथेरान, भिमाशंकर, पेब, हरिश्चंद्रगड किंवा नाणेघाट ही ठिकाणं सांगु नका. नाही म्हणजे ही ट्रेक्स खरोखर फार चांगली आहेत पण आमची ती झाली आहेत! तेव्हा आम्हाला तुमच्या मदतीची अत्यंत गरज आहे!

ही झाली जनरल मदत! आता एक आणखी एक फेवर! मला एक सर्वसाधारण (यस्स! आठवला ’जनरल’ला मराठी शब्द! आता फक्त तो ’फेवर’ राहीला!) उपयोगासाठी कॅमेरा घ्यायचाय! मी काही छायाचित्रण कलेत ’प्रो’ नाहीये! मी आपला एक साधासुधा ’हौशी’ छायाचित्रकार आहे. मी निकॉन कुलपिक्स पी९० किंवा पी१०० घेण्याचा विचार करतोय! माझे बजेट (माफ करा, पण मला खरोखर ह्या सगळ्या इंग्रजी शब्दांना मराठी पर्याय आठवत नाहीये आता!) २५००० ते ३०००० आहे. तेव्हा तुम्ही मला एखादा कॅमेरा सुचवाल का? फंक्शन्स साधारण पी९० चेच असावेत!

मी तुमच्या प्रतिसादाची अगदी आतुरतेने वाट बघतोय!

घरची लक्ष्मी

4 टिप्पणी(ण्या)
दोन दिवस घरी एकटाच होतो. गुरुवारी मामेबहिणीचं लग्न होतं. आई नि बायको दोघीही मंगळवारी संध्याकाळीच तिकडे गेल्या होत्या. जातानाच सांगुन गेल्या की सगळ आवरुन ठेवलं आहे. कुठे काय ठेवले आहे ह्याची एक उजळणीच सतत चालु ठेवली होती. दोघींचं म्हणनं एकचं "घर आहे तस ठेवा!"

हेच तर आम्हाला, म्हणजे मी, पप्पा नि भाऊ आम्हा तिघांना अवघड जाणार होतं! बुधवारी सकाळी ऊठल्यापासुन आमची बोंब सुरु झाली. एक वस्तु जागेवर सापडेल तर शपथ! मग चालु झाले आमचे फोन "अग! हे कुठेय?... अगं माझं आयडी कुठं ठेवलस?..." आणि हे फोन कराण्यात फक्त मीच पुढे होतो अस नाही तर पप्पा नि भाऊ दोघांनीपण "LOOP Mobile दान योजना" सुरु केली होती.

बुधवारीतर आम्हीपण लग्नाला गेलो, पण ह्या दोन दिवसात, आईच्या भाषेत सांगायच तर आम्ही घराचा ’उकिरडा’ केला होता! साल्या ह्या मुंग्याना पण लगेच समजत कि ह्या घरातली बाई कुठेतरी गेली आहे. त्या चारही कोपऱ्यांतुन सर्वत्र संचारास्तव निघतात. एकाच दिवसाचे कपडे बघितल्यावर तिघांनी पण ठरवुन टाकलं कि आता कमीत कमी ६ महिने तरी कपडे घ्यायचे नाहीत! जेवणाचे हाल जरा कमी झाले! कारण आता हॉटेल्स गल्लोगल्ली झाली आहेत ना!

गुरुवारी दोघी घरी आल्यावर घर जरा परत माणसांत आलं! लॅपटॉप लावण्यासाठी त्याचा अ‍ॅडाप्टर मला नेहमीच्याच जागी  मिळाला. दुसऱ्या दिवशी बनियान परत वॉशिंग मशिनवर होता नि माझं आय कार्ड बरोबर बॅगेतच होतं! मुंग्यांनी नि झुरळांनी माघार घेतली होती! आणि दोन दिवसांनंतर मी पुन्हा एकदा ताजं स्वच्छ पाणी पित होतो नि देवाला ही ’घरची लक्ष्मी’ बनवण्याची सुबुद्धी झाल्याबद्दल त्याचे आभार मानत होतो!









  सहजच एक सुचलं म्हणुन विचारतो, साफसफाइच्या ह्याच सारखेपणामुळे झाडुलापण ’लक्ष्मी’ म्हणत असतील का?

विधानपरिषदेचा घोडाबाजार

0 टिप्पणी(ण्या)
विधानपरिषदेचा घोडाबाजार, आपलं निवडणुक संपली पण त्याचं कवित्व काही संपायचं नाव घेत नाहिये. आजच्या सामनात राज ठाकरे ह्यांना ’धनाजीराव’ हे नाव देण्यात आले आहे. (शिवसेनाप्रमुख त्यांच्या विरोधकांना नावं बाकी मस्त ठेवतात. लखोबा काय नि नारोबा काय! साहेबांचे हे एक आपल्याला जाम आवडतं!). हां तर, सांगायचा मुद्दा हा की, मनसेने "पैशांच्या थैल्या" घेऊन कॉंग्रेसचे आमदार निवडुन दिले, असं सामनाच्या संपादकांचे म्हणणे आहे.

आता ह्या विधान परिषदेच्या निवडणुकींच्या वेळी प्रचंड आर्थिक ’देवाणघेवाण’ होते, हे एकप्रकारे आपण सगळ्यांनी मान्य केले आहे असा एकंदरीत सर्व माध्यमे, जनता ह्यांचा सुर दिसुन येतोय! हा लोकशाहीला अत्यंत घातक असा पायंडा पडत चालला आहे. माध्यमांना ह्या घोडे बाजारावरील ’न्युज’शी काहीही देणं घेणं नाही, त्यांना ’उध्दव-राज’ ह्या जंगी सामन्यात खरा इंटरेस्ट आहे. म्हणुन तर एकाही बातमीत किंवा लोकल गाड्यांमध्ये चर्चा रंगल्या आहेत त्या, ’राज साहेब योग्य बोलले किंवा उध्दव ठाकरे ह्यांनी राज ठाकरे ह्यांना मस्त शालजोडीतली दिली’ ह्या विषयांच्याच! एकाही चर्चेचा विषय ह्या निवडणुंकामध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना विरोध हा दिसुन येत नाही! लोकांना खरचं ह्या विधान परिषदेच्या निवडणुकांत काही इंटरेस्ट असावा का? ह्याचं उत्तर नाही असच द्यावं लागेल!

ह्या विधान परिषदेची मुळातच काही गरज उरली आहे का? काही राज्यांत अशा प्रकारचे ’अपर’ सभागृह अस्तित्त्वातच नाही आहे! आणि तशीही ह्या सभागृहाची गरज ही फक्त काही ’गरजवंतांची’ सोय म्हणुनच उरलेली दिसुन येतेय! सरळ निवडणुकीत हरलो तरीही मंत्री बनायचय? काही काळजी नाही, पक्ष विधान परिषदेत देईलच निवडुन! पुतण्याची ’करियर’ बनवायची आहे? आहे, विधान परिषद आहे! काही गंभीर आरोपांमुळे विधानसभेचा राजीनामा द्यावा लागला? नो प्रॉब्लेम, आरोपांचा धुरळा खाली बसेस्तोवर विधान परिषदेच्या निवडणुका लागतच आहेत! हे सभागृह हे समाजातील कलावंत, वैज्ञानिक, खेळाडु, शिक्षक ह्यांना कायदेमंडळात स्थान मिळाव म्हणुन आहे! पण विधानपरिषदेत ह्या क्षणाला किती कलावंत, वैज्ञानिक, खेळाडु, शिक्षक आमदार आहेत? अक्षरश: हाताच्या बोटांवर मोजण्याइतके!

कुठेतरी वाचलं होतं, समाजाला त्याच्या लायकीचाच पालनकर्ता भेटत असतो. रामराज्यातील प्रजा चांगली होती म्हणुनच त्यांना ’रामा’सारखा राजा मिळाला! आज आपल्या सरकारतील बरेच मंत्री कुठ्ल्याना कुठल्या वादात अडकल्याचं दिसुन येते. आपल्या गृहराज्यमंत्री तर एकापेक्षा एक गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकल्याचे चित्र आहे! हे सगळं होते कारण आपला निवडणुकीच्या बाबतीतला प्रचंड अनुत्साह! आपण जर योग्य उमेदवारांची निवड केली तर हा घोडे बाजार काही अंशी तरी टाळता येऊ शकतो. त्यासाठी आपणचं प्रयत्न करायला हवेत.

न्याय?

0 टिप्पणी(ण्या)
आज २६ वर्षांनंतर भोपाळ गॅस दुर्घटनेत मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी आज निकाल दिला. आठ दोषींना २-२ वर्षांचा कारावास आणि १ लाख रुपये दंड आणि युनियन कार्बाईड या कंपनीला ५ लाख रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आल्या आहेत. मात्र ह्या कंपनीचा त्यावेळेचा अमेरिकन अध्यक्ष वॉरेन अ‍ॅंडरसन हा अजुन फरारी आहे. त्यामुळे खरचं भोपाळवासीयांना न्याय मिळाला आहे का?

मुळातच न्याय द्यायला २६ वर्षे कशी लागु शकतात? सुमारे २५००० जणांचा जीव घेणाऱ्या ह्या घटनेचे सरकार, न्यायालये आणि समाज ह्यांना खरेच काही गांभिर्य आहे की नाही? आजही ह्या वायुगळतीचे दुष्परिणाम भोपाळ आणि आजुबाजुच्या परिसरात जाणवत आहेत. आज पाव शतकानंतरही तेथील नागरिकांना श्‍वसनाचा, डोळ्याचा व स्त्रियांना मासिक पाळीचा त्रास होतो आहे. ह्या सगळ्याला जबाबदार कोण?

ह्या कंपनीची मुळ कंपनी असणाऱ्या UCC (Union Carbide Corporation) ह्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करुन कंपनीच्या देखभालीबाबत गंभीर आक्षेप नोंदवले होते. तरीसुद्धा त्याची दखल घेण्यात आली नव्हती. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना धोकेदायक रसायने, वायु हाताळण्याबाबतचे योग्य प्रशिक्षण देण्यात आले नव्हते. एवढेच नव्हे तर वायुगळती सुरु झाल्यावर त्यावर कोणत्या प्रकारची खबरदारी घ्यावी किंवा त्या वायुगळतीविरुद्ध काय उपाय करण्यात यावेत हे प्रशासनाला सांगायलादेखील कंपनीचा कोणताही अधिकारी उपलब्ध नव्हता.

ह्यावरुनच ह्या कंपनीच्या अधिकाऱ्यांची कायदा खिशात घालण्याची मनोवृत्ती दिसुन येते. न्यायसंस्थेने उपलब्ध कायद्यांच्या आधारे हा निकाल दिला. पण ह्या मिळणाऱ्या १३ लाख रुपयांनी वायुग्रस्तांना भरपाई कशाप्रकारे देण्यात यावी हे देखील मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी सांगितले असते म्हणजे बरे झाले असते! आतापर्यंतच्या सर्व केंद्र सरकारांनी किती वेळा अ‍ॅंडरसनच्या हस्तांतरणासाठी जोरदार पाठपुरावा केला आहे? एकदाही नाही!!! हे लोकांचे सरकार, त्यांच्या लोकांच्याच बाबतीत एवढे उदासिन कसे राहु शकते? एकाही केंद्रिय किंवा राज्य मंत्र्याचे आजच्या न्यायदानावर कुठल्याही प्रकारचे भाष्य आलेले नाही! जो तो आपल्यामध्येच मग्न! सामान्य मरतोय ना, मग मरुदेना तिच्या आयला! आम्ही आमच्या सरकारचे १०० दिवस, १ वर्ष साजरे करण्यातच धन्यता मानणार! वरती ह्याच डाऊ कंपनीला योग्य भरपाई घेतल्याशिवाय आणखी प्ल्यॅंट्स बांधायला परवानग्या देणार!

ह्या दुर्घटनेत ’जस्टिस’ नुसताच ’डिले’ झालेला नाही तर तो ’डिनाईड’ झालेला आहे! भोपाळ वायुग्रस्तांची लढाई अजुन संपलेली नाही. ती वॉरेन अ‍ॅंडरसनला शिक्षा होईपर्यंत चालुच राहणार आहे. तोपर्यंत करुयाच आपण सगळे ह्या ’जगातील सर्वात मोठ्या औद्योगिक दुर्घटनेचा’ महोत्सव साजरा दरवर्षी!!!

ता.क.: हा वॉरेन अ‍ॅंडरसन म्हणे आपल्या देशातल्या एका फार मोठ्या राजकिय घराण्याच्या अतिशय जवळकीतला आहे!

माझी प्रेमप्रकरणे

0 टिप्पणी(ण्या)
प्रकरण १

मी सातवीत होतो. आमच्या वर्गात एक अतिशय सुंदर मुलगी होती. ती मला फार आवडायची.
बस्स...



प्रकरण २

दहावी...
सगळीकडुन सकाळ संध्याकाळ नुसतं अभ्यासाचं टेन्शन... सकाळी ह्या क्लासला जा, संध्याकाळी त्या क्लासला जा... आणि सकाळच्या ’ह्या’ क्लासचे सरच आम्हाला शाळेत गणित नि रसायनशास्त्र शिकवायला होते. त्यांनी बीजगणित-भुमिति मधले एकुणेक गणित क्लासमध्ये सोडवुन घेतलं होतं, त्यामुळे शाळेत आम्ही त्यांच्या क्लासचे जेवढे म्हणून विद्यार्थी होतो ते सर्व शाळेत एकदम सुममध्ये त्यांनी दिलेली गणितं सोडवुन वर्गात ’शायनिंग’ मारायचो.

असंच एक दिवस त्यांनी एक-दोन अवघड उदाहरणे घरुन सोडवुन आणायला सांगितली. मी नेहमीप्रमाणे ’शायनिंग’ मारली कि हि गणितं तर आम्ही कधीच सोडवली आहेत. झालं... वर्गातल्या एका लोकप्रिय-शिक्षकप्रिय मुलीने ते ऐकलं नि मला म्हणाली

"ए काशिद, तुझी वही मला दे ना!"
"अग, मी दिली असती पण आमचा परवा सकाळी क्लासमध्ये बीजचा पिरिएड आहे ग!’
"अरे, एवढच ना! मी तुझी वही उद्या वर्गात आल्या आल्या परत देईन, मग तर झालं ना!"
अगोदरच एका मुलीने वही मागितली म्हणून मी हवेत होतो आणि आता तिने एवढं प्रॉमिस केल्यावर मी कशाला नाही म्हणतोय!
"ए, पण नक्की दे ऊद्या."
असं म्हणुन मी तिला माझी वही दिली.
पण दुसर्‍या दिवशी तिला वर्गात न पाहून आमच्या, आमच्या कपाळात!
पहिला तास सुरु झाला. मॅडमनी हजेरी घेतली नि शिकवायला लागल्या... तेवढ्यात एक सुंदर मुलगी वर्गाच्या दरवाज्यात येऊन ऊभी राहिली.
"मॅडम, मी आत येऊ?"
"ये" इति मॅडम.
"हं, बोल!"
आता आमचं सर्वांचं लक्ष तिच्याकडे!
"मॅडम, मी आठवीतली ***, तुमच्या वर्गातल्या **ची मैत्रिण. मी तिच्या जवळच राहते. ती आजारी असल्याने आज येणार नाहीये!"
"एवढच सांगायचं होतं का?"
"नाही मॅडम, आणखी एक काम होतं, ही वही काशिदला द्यायची होती!"
आणि वर्गातल्या तमाम पोरांना चिरकायला एक कारण मिळालं!
"ए, हसायला काय झालं! गप बसा सगळ्यांनी"
मॅडम बोलल्या तशी पोरं गप झाली. मी ऊठलो नि वही घेऊन आपल्या जागेवर येऊन बसलो.
बस्स, पोरांना कारणच मिळालं, दुसर्‍या दिवसापासुन जो तो मला चिडवु लागला. माझं तर एकदम "Love at first sight" झालं होतं. मलातर ती जाम म्हणजे ज्यामच आवडली होती. म्हणून मी ते चिडवण एन्जॉय करत होतो. एके दिवशी माझ्या बेंचवर बदामच्या चित्रात मला माझे नि तिचे नाव लिहिलेले दिसले. मनातुन आनंदच्या उकळ्या फुटत होत्या तरी मी ऊगाचच रागवण्याचं नाटक करत होतो. माझ्याही वह्यांमध्ये पानापानावर तिचेच नाव दिसु लागले.

हळु हळु ही खबर माझ्या जवळच्या मित्रांना समजली. त्यांनी मला तिला प्रपोज करायचे सल्ले द्यायला सुरुवात केली. पण माझी हिंमत काही झाली नाही.

असेच अनेक दिवस गेले. ती वर्गात तिच्या मैत्रिणीला भेटायला आली कि माझा जीव वरखाली व्हायचा! नि मित्र मुद्दाम मला जोरात काहीही काम नसताना हाक मारायचे!
आणि एक दिवस

"अरे काशिद, तुझी *** आज मी आपल्या ** सरांच्या मुलाबरोबर बागेत गप्पा मारताना बघितली! एकमेकांना चिटकुन बसले होते यार!"

मनात विचार आला "आयला, त्याचा बाप सर आहे, नि आपल्याला शिकवतो. उगाच कशाला त्याच्याशी पंगा घ्या! एकतर आपलं दहावीच वर्ष. फुकट त्याचा बाप वर्षभर खुन्नस ठेवेल आपल्यावर!"

बस्स...


!! इतिश्री द्वितियोध्याय संपुर्णम !!

अनेक प्रजाती, एक ग्रह, एक भविष्य

0 टिप्पणी(ण्या)
काल ५ जुन, जागतिक पर्यावरण दिन.

दरवर्षी युनायटेड नेशन्स एक विषय घेऊन हा दिवस साजरा करित असते. ह्या वर्षीचा विषय होता, ’अनेक प्रजाती, एक ग्रह, एक भविष्य’... हे वर्ष ’युनायटेड नेशन्स’ने ’आंतर्राष्ट्रिय जैव विविधता’ वर्ष जाहिर केलेले आहे. ह्या आपल्या ग्रहावर अंदाजे ५ ते १०० दशलक्ष वेगवेगळ्या प्रकारचे जीव नांदत आहेत. पण त्यापैकी मानवाला फक्त २ दशलक्ष जीवांची ओळख पटलेली आहे. म्हणजे अजुनही असे अनोळखी जीव ह्या पृथ्वीतलावर आहेत.
ह्या असंख्य जीवांमध्ये मानव हा एकच प्राणी असा आहे कि ज्याची लोकसंख्या अमर्याद वेगाने वाढत आहे. त्याच्या गरजा वाढत आहेत. त्याची भुक वाढत आहे. आणि ह्याचमुळे त्याने इतरांच्या हक्कांवर हल्ला केला आहे. त्यामुळे बरेच जीव ह्या जीवनाच्या शर्यतीतुन बाहेर पडत चालले आहेत. असे बरेच जीव आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
सुमारे १२००० जीव हे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. ह्यात फक्त मानवास ज्ञात असणाऱ्या जीवांचाच समावेश आहे. कित्येक जीवतर आपणांस त्यांची ओळख होण्याच्या अगोदरच नामशेष होत आहेत.

ह्याला कारण एकच... मानवाच्या अमर्याद वाढीचा अमर्याद वेग. मानवाने सरळ सरळ ह्या जीवांच्या हक्काच्या परिसर परिघात अतिक्रमण केले आहे. साधं उदाहरण म्हणजे ’दिवा’ गाव. हे गाव, म्हणजे आता ह्याला गाव का म्हणायाचं हा मोठा प्रश्न आहे एवढी ह्या गावाची लोकसंख्या गेल्या काही वर्षात वाढली आहे. हां तर काय सांगत होतो तर ह्या दिवा गावात खाडीवर भराव टाकुन इमारती बांधल्या आहेत. आणि महत्त्वाचे म्हणजे ह्या सर्वच्या सर्व इमारती अनधिकृत आहेत. ह्या गावात माझ्या माहितिप्रमाणे फक्त ४ इमारती अधिकृत आहेत. खाडीत भराव टाकल्यामुळे तेथे असणाऱ्या तिवरांची बेसुमार कत्तल झाली आहे. ह्या तिवरांच्या आधारावर जगणारे जे जीव होते त्यांची कत्तलतर कुणाच्या खिजगणतीतही नसेल! ह्या इमारती बांधण्यासाठी लागणारी वाळूदेखील ह्याच खाडीतुन अनधिकृतरित्या काढली जात आहे. त्यामुळे देखील ह्या खाडीतील जैववैविध्याचा नाश होत आहे.

पण ह्या नजिकच्या फायद्यासाठी आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेत आहोत, हे दुर्दैवाने आपल्या लक्षात येत नाहीये. ह्या पृथ्वीवर असणाऱ्या प्रत्येक जीवाचा एक दुसऱ्याशी संबंध आहे. हे आपण लहान असताना शाळेत शिकलोय पण आता विसरलोय किंवा सोयिस्करपणे विसरत आहोत. ह्या जैवसाखळीतला एक जरी दुवा निसटला तरी ही साखळी पुर्णपणे तुटणार आहे. आणि ही साखळी टिकवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावा म्हणुन हे वर्ष UENP (United Nations Environment Program)ने ’आंतर्राष्ट्रिय जैव विविधता’ वर्ष जाहिर केलेले आहे.

आपणांकडे वेळ फार थोडा आहे. जे काही करायचे आहे ते लवकर करायचे आहे. नाहितर आपलेच भविष्य फार अंध:कारमय आहे.

सौजन्य : http://www.unep.org/wed/2010/english/theme.asp

बेबी स्टेप्स...

2 टिप्पणी(ण्या)
नमस्कार,

ब्लॉगच्या विश्वात हे माझे पाहिले पाउल! माझा पहिला ब्लॉग...
नमस्कार,

ब्लॉगच्या विश्वात हे माझे पाहिले पाउल! पण का लिहितोय मी हा ब्लॉग? कारण कधीतरी उगाचच काहीही सुचतं म्हणून...
जे सुचेल, जे मला आवडले ते लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे! तुम्हाला पटलं, आवडलं, नाही पटलं, नाही आवडलं तरी मला कळवा... चुकलं तर शिकवा! इ अं जुस्त अ नेव्बी इन ठिस... म्हणजे I am just a newwbee to this!

धन्यवाद