Introduction

माथेरान वारी

2 टिप्पणी(ण्या)
मागच्या रविवारी आम्ही मित्र माथेरानला जाऊन आलो. नविन घेतलेल्या कॅमेराने काढलेली ही काही छायाचित्रे. पहिला प्रयत्न असल्याने काही चांगली आली नि बरीचशी....! तुम्हीच ठरवा आता!

लोकलचा ’फर्स्ट क्लास’

0 टिप्पणी(ण्या)
लहानपणी मोठेबाबांकडे जाण्यासाठी जेव्हा जेव्हा लोकल ट्रेनने प्रवास करायचो तेव्हा तेव्हा ’फर्स्ट क्लास’चा रिकामा डब्बा पाहुन त्या डब्ब्यात प्रवास करावा असं वाटत राहयचे! पण त्याकाळच्या परिस्थितीत ते शक्य नव्हतं! पण जसा नोकरीला लागलो नि पगार वाढत गेला तेव्हा प्रथम दर्जाचा मासिक पास काढावासा वाटला नि हा विचार लगेच अंमलात आणला. लोकलच्या ’द्वितीय दर्जा’ ते ’पहला दर्जा’ ह्या प्रवासात जाणवल की येथे फक्त डब्ब्यांच्या ’सिट्स’ मध्येच नाही तर प्रवाशांच्या ’थॉट्स’ मध्ये सुद्धा बराच फरक आहे.

द्वितीय दर्जा हा सर्वसमावेशक असल्यामुळे येथे अठरापगड लोक दिसुन येतात. कुणीही कोणत्याही अवतारात आला तरी त्याला डब्ब्यात जागा असते. मग त्याच्याकडे तिकीट असो किंवा नसो! पहिल्या दर्जाच्या डब्ब्यात मात्र अवतार हा नेहमी ’अप टु डेट’च असावा लागतो!  नाहीतर लगेच, ’बॉस, फर्स्ट क्लास है!" चा ओरडा चालु होतो. मलासुद्धा एकदा ह्या दर्जाची हवा लागली. मी एका पोरगेलासा दिसणाऱ्या व्यक्तीला त्याचा अवतार पाहुन असंच म्हटलं ’बॉस, पुढच्या स्टेशनला ऊतरुन घे, टी.सी. आलातर ऊगाच २००-३०० जातील फुकटचे!’ तेव्हा त्याने मला जे उत्तर दिले त्याने मी ठरवलं इथुनपुढे कधीही कुणालाही ’फर्स्ट क्लास है’ हे सांगायचं नाही. तो मला म्हणाला, ’मला माहिती आहे, हा आमचा युनिफॉर्म आहे नि मी एका कॉलेजमध्ये स्पोर्ट्स कोच आहे!"

हिच गत पहिल्या दर्जात दिसणाऱ्या वर्तमानपत्रांध्ये दिसुन येते. मला कधी कधी संशय येतो की रेल्वेने फर्स्ट क्लासचा पास देण्यासाठी ’एकॉनॉमिक्स टाईम्स’ कंपलसरी केलाय की काय? ज्याच्या त्याच्या कडे बघावं तर हे वर्तमानपत्र. प्रत्येकजण जणु काही मोठा शेअर ब्रोकरच! हा नसला तर डि.एन.ए नाहीतर ’टाईम्स’ आहेच! तसंच हातातल्या पुस्तकांचं. इथेही इंग्रजीच पुस्तक असतं आणि तेही ’नेहेमीच्याच यशस्वी कलाकारांचंच’. हे नेहेमीचेच यशस्वी कलाकार म्हणजे सिडने शेल्डॉन, जॉन ग्रिशम आणि पाऊलो कोहेलो! ह्याव्यतिरिक्त मला कधी कुणी क्वचितच दिसला असेल! मराठी वर्तमानपत्र कदाचित दिसेन ह्यांच्या हातात, पण बाकीचे मराठी लेखक तर सोडाच पण एव्हरग्रीन पुलंचही पुस्तक कधी दिसणार नाही!

इथली लोकं चुकुनही दुसऱ्याला बसायला जागा देणार नाहीत. मुंबई ते डोंबिवली, एकदा बसले म्हणजे बसले! ऊठायचे ते फक्त ऊतरायचे स्थानक येण्याचा काही सेकंद अगोदर! दुसऱ्या दर्जाच्या डब्ब्यात मात्र गाडीने विक्रोळी सोडले की कल्याणपासुन उभी असणारी लोकंच हक्काने सांगतात ’चलो भाई, पंप बंद करेके बैठनेको जगह दे दो!’ आणि तिनच्या सिटवर चौथा हक्काने ’थोडा खिसके बैठो’ म्हणुन जागा मागतो. ह्यात बसलेल्या तिघांनापण काही वावगे वाटत नाही. तेसुद्धा शांतपणे सरकुन जागा देतात. पहिल्या दर्जात मात्र तिनच्या सिटवर फक्त तिघेच बसतील! भले ते कितीही बारीक का असेनात!

पहिल्या दर्जातले लोक तसे पक्के शामळु! साधा बंद पंखा चालु करायला ही लोक सांगत नाहीत! बहुतेक असं कुणाला काही काम सांगणं ह्यांच्या ’स्टेटस’ मध्ये बसत नसावं! इतरवेळी कायद्याप्रमाणे वागणारी ही माणसे फक्त एकाबाबतीत थोडा धीटपणा दाखवतात. ’कृपया सीटवर पाय ठेवु नये.’ ह्या सुचनेचे उल्लंघन करताना! एवढी शिकलेली माणसे, पण ही साधी सुचना का पाळत नाही हे मला कधीच समजलेले नाही. ह्या सुचनेतुन ह्या लोकांनी एक मस्त पळवाट शोधुन काढलेली आहे. ती म्हणजे चपला किंवा बुट काढुन सीट्सवर पाय ठेवण्याची! पण अरे मुर्खांनो सुचना पाय न ठेवण्याची आहे, पादत्राणे न ठेवण्याची नाही!

माझं ह्या दर्ज्याच्या लोकांबाबतीत आणखी एक निरिक्षण अस आहे की, बहुतेक सर्व दक्षिण भारतीय ह्याच डब्ब्यातुन प्रवास करताना दिसतात! ह्यांचे सगळ्यात मोठे लक्षण म्हणजे ह्यातील बहुतेकजण हा सर्व डब्बा आपलाच आहे ह्या विचारात असतात! इतरांना ते अक्षरशः कःपदार्थ समजतात! एक किस्सा आठवला म्हणुन सांगतो. सकाळच्या डोंबिवली लोकलला ह्या पहिल्या वर्गाच्या डब्ब्यात एक मोठा दक्षिण भारतीय ग्रुप चढतो आणि दरवाज्याच्या मधल्या मोकळ्या जागेत जागा अडवुन उभा असतो. एकदा २-३ रेल्वेचे लाईनमन ह्या डब्ब्यात चढले. त्यांचे कपड्यांचा मुळचा लाल रंग जाऊन तो काहीतरी भलताच झाला होता. ह्या ग्रुपमधला एकजण बोललाच ’ये फर्स्ट क्लास है!’ ग्रुपमधला दुसऱ्याने पहिल्याला अडवुन म्हटले ’रेल्वेवाले है, उनके बाप का गाडी है!’ ह्यावर एक लाईनमनने त्यांना सुनावले ’निचे उतरके गाडी आगे नही जाने दुंगा ना तो भी कोई हमे कुछ नही कहेगा! तम्मीजसे बात करो!’

ह्या लोकांचा हा अनुभव तर गुजराती लोकांची आणखी वेगळीच तऱ्हा! ही जमात दुसऱ्यांना मदत करायला नेहमीच पुढे. गर्दीत अनोळ्खी लोकांना पाणी दे नाहीतर उठुन जागा दे अशाप्रकारे ह्यांचं समाजकार्य चालु असतं! पण ह्यांचा तीन गोष्टीत फार राग येतो! एक म्हणजे ह्यांनी शेअर मार्केटवर चर्चा सुरु केली की, पत्ते खेळायला सुरुवात केली की नि गुटखा खाल्ला की! ही लोकं नेहेमी पन्नास जणांशी एकाचवेळेला बोलल्यासारखे ओरडुन का बोलत असतात कुणास ठाऊक? ह्या दोन जमाती सोडल्यातर पहिल्या वर्गात सहसा काहीही ’इंट्रेस्टिंग’ घडवुन आणत नाही!

तर असा हा पहिला वर्ग! ’व्हाईट कॉलर्ड’ आणि ’स्टीफ अपर लीप’ वाल्यांचा वर्ग! आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे तो प्रत्येक वेळेला लक्षात ठेवत असतो. म्हणुन तर पास किंवा तिकीट काढताना देखील हा वर्ग रुबाबात रांगेतल्या १-१ २-२ तास ऊभ्या असणाऱ्या लोकांकडे तुच्छ नजरेने बघत सरळ पुढे जातो नि तिकीट पास काढुन रुबाबात निघुन जातो. रांगेतले बिचारे त्याच्यामागे शंख करतात ’फर्स्ट क्लास का क्या निकाला तो सालेने पुरा रेल्वेही खरीद लिया!’

पुंडलिक वरदे हरि विठ्ठल

1 टिप्पणी(ण्या)
काल जेष्ठ कृष्ण सप्तमी. अवघ्या महाराष्ट्राची माऊली संतश्रेष्ठ श्री ज्ञानोबा ह्यांच्या पालखीचे आळंदीहुन पंढरपुरसाठी प्रस्थान झाले. त्याअगोदर दोन दिवस जगतगुरु तुकोबाराय ह्यांची पालखी देहुहुन निघाली. दोन्ही पालख्या आणि इतर संतांच्या पालख्या ह्या साधारण १८-२० दिवसांचा प्रवास करुन आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी ’आषाढी एकादशी’ साठी पंढरपुर येथे पोहचतील.

ह्यावर्षी पालखीच्या प्रस्थानाच्या दिवशी आळंदीत जाण्याचा योग आला. तसं आमचं घराणं माळकरी! आमचे मोठेबाबा हे दरवर्षी वारीला न चुकता जाणारे. आमचे पप्पा कधी पायी वारीला गेल्याचे मला आठवत नाही पण ते प्रत्येक आषाढीला पंढरपुरला जातात. म्हणजे वारी आम्हाला नविन नाही. पण मी मात्र पहिल्यांदाच वारीत सहभागी झालो होतो. मान्य आहे कि पालखी प्रस्थान सोहळा म्हणजे काही वारी नव्हे पण वारीच्या ह्या सोहळ्यातसुद्धा सुमारे २-३ लाख लोक सहभागी झाले होते. आणि हा सोहळा खरोखर अनुभवण्यासारखा असतो.

वारीत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राच्या (कि देशाच्या? कारण कर्नाटकातुन आलेल्या काही गाड्या मी काल तिथे पाहिल्या!) कानाकोपऱ्यातुन वारकरी आले होते. ह्यात सर्व जातीधर्माचे लोक होते. कोणीही उच्च निच भेदभाव पाळत नव्हता. प्रत्येकजण एकमेकाला ’माऊली’ ह्याच नावाने संबोधत होता. एका म्हाताऱ्या आजीचा मला धक्का लागला तर ती चक्क मला ’माऊली’ म्हणुन मला पटापट चालायला सांगत होती. अक्षरश: माझ्या तीन वर्षाच्या मुलाला बघुन म्हणाली ’ह्या माऊलीला वारीला आणलत ते बरं केलंत!’ माझ्या आजीच्या वयाची ती बाई मला व माझ्या पोराला ’माऊली’ म्हणतेय हे बघुन खरोखर माझ्या डोळ्यांत पाणी आलं!

आपल्या घरादाराची चिंता काळजी मागे ठेऊन हे सर्वजण १५ दिवस एकच ध्यास घेऊन चालत असतात. त्यांच्या विठुरायाच्या दर्शनाचा ध्यास! खरतर हे पावसाळ्याचे दिवस म्हणजे त्यांचे कामाचे दिवस पण सर्व कामे आटोपुन किंवा आपल्या लेकासुंनांवर सोपवुन ही सर्व निघालेली असतात त्या ’विठ्याच्या’ दर्शनाला! आणि प्रस्थान सोहळ्यासाठी आलेला प्रत्येकजण पुढे वारीला जातो असे काही नाही! काहीजण हा प्रस्थान सोहळा आटोपुन परत आपल्या गावी परतात! काल ’भारत बंद’! सर्व सार्वजनिक वाहतुक जवळ जवळ बंदच होती! शिवाय कुठेही कधीही ’राडा’ होऊ शकेल ह्याची भिती होती. पण ती चिंता ते क्लेश जणु ’देशांतरा’ पाठवुन ही सगळी मंडळी काल आळंदीत जमा झाली होती! मी आळंदीतुन पुण्याला परत येण्यासाठी निघालो तेव्हा एकजण मला म्हणाला की मलापण बार्शीला जायाच्या गाड्या निघतात तिथवर सोडाल का? चौकशी करता कळली कि तो निव्वळ ह्या ’दिंडीला वाटंला लावायला’ बार्शी तालुक्यातला कुठल्याशा गावातुन आला होता. घरात एकवेळ खाण्याची भ्रांत असेल पण वारीला जाण्यासाठी ही लोकं कुणापुढे हात पसरायला मागे पुढे पाहत नाहीत! वर्षाच्या अकरा महिन्यांचे कष्ट कित्येकजण निव्वळ ह्या एका महिन्यासाठी सहन करीत असतात!

आणि एवढी गर्दी असुनही मला कुठेही कोणत्याही प्रकारची गैरसोय किंवा गडबड दिसली नाही. जो तो एकदम शिस्तबद्ध वागताना दिसत होता. प्रत्येकजण इतका शिस्तीत होता की मनात विचार आला की वारीव्यतिरिक्त ह्यातले कितीजण एवढी शिस्त पाळत असतील? पण सांगायचा मुद्दा हा की खरोखरच काल कुठलाही प्रकारचा गोंधळ नव्हता. सगळ्या गाड्या व्यवस्थित पार्क केल्या होत्या! एकामागोमाग एक दिंड्या निघत होत्या पण त्या वाहतुकीला तसुभरही अडचण आणत नव्हत्या! मुळात कुणीही त्या गर्दीत उगाचच गाडी घालण्याचा प्रयत्न करीत नव्हता! जणु काही ’माऊली माऊली’ म्हणुन प्रत्येकाच्याच मनात एकप्रकारचा दुसऱ्याविषयी मायेचा ओलावा भरुन आला होता! वाहतुक पोलीस होते. पण त्यांना बिलकुल काम करण्याची गरजच नव्हती. एवढ्या प्रचंड जनसमुदायाला आवर घालण हे खरतर अतिशय कठिण पण इथे मात्र ते सगळ्यात सोपं असल्यासारखं वाटत होतं! पोलिसांनीसुद्धा त्यांचा जगप्रसिद्ध पोलिसी खाक्या इंद्रायणीत सोडुन दिला होता. एकाही पोलिसाला कुणावरही एकदाही उगाचच डाफरताना पाहिल नाही! तेसुद्धा ’माऊली’ म्हणुनच सगळ्यांना वागवत होते!

 आणि जशी ’माऊलीं’ची पालखी महादरवाज्याचा बाहेर पडली तसा सगळीकडे एकच नाद ऐकु येउ लागला ’पुंडलिक वरदे हरि विठ्ठल’! सगळीकडुन टाळ नि मृदुंगाचे स्वर ऐकु येत होते. भजनांचे आवाज आसमंत भारुन टाकत होते! एका दिव्य यात्रेला प्रारंभ झाला होता! अवघ्या महाराष्ट्राचे सर्व प्रश्न आता मागे पडणार आहेत! ग्यानबा तुकाराम हेच आता विदर्भ, मराठवाडा कोकण पश्चिम महाराष्ट्र सगळीकडे असणार आहेत. आता पाउले चालणार आहेत ती पंढरीची वाट!